वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काश्मीर मुद्यावर चीन आणि भारतातील मतभेद आता उघड झाले आहेत. या प्रकरणी चीनच्या नाराजीला कुठलाच अर्थ नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच भारताने स्वतःच्या आक्रमक भूमिकेतून या प्रकरणी अन्य देशाचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरसह अक्साई चीनबद्दल भारताने भूमिका घेतल्याने ही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांनी शपथ घेतल्यावर चीनने हरकत दर्शविली होती. पाकिस्तानसोबत पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा करण्याची तयारी असल्याची ठाम भूमिका भारताने घेतली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येच अक्साई चीनचा अंतर्भाव होतो.
चीनला सतावतेय भीती
पीओकेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाण्याची शक्यता पाहता चीन अस्वस्थ होतोय. केवळ भारताची भूमिका नव्हे तर पाकिस्तानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याने चीनसमोर समस्या उभी ठाकली आहे. या गुंतवणुकीचा पहिला टप्पा सीपॅक असून तो पाकव्याप्त काश्मीरमधूनच पाकिस्तानात दाखल होतो. या प्रकल्पाबद्दल भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःची नाराजी व्यक्त केली.
अक्साई चीन
अक्साई चीन सद्यकाळात झिंजियांग उइगूर स्वायत्त क्षेत्राचा हिस्सा आहे. होटन काउंटीचा तो एक मोठा हिस्सा आह. 37244 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या अक्साई चीनबद्दल चीन सातत्याने जगासमोर चुकीचे चित्र मांडत आहे. हा पूर्ण भाग जम्मू-काश्मीरच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे 15 टक्के असून त्यावर चीनने कित्येक वर्षांपासून अवैध कब्जा केला आहे. समुद्रसपाटीपासून अक्साई चीनची उंची सुमारे 14 हजार फुटांपासून 24 हजार फूटांपर्यंत आहे. चीनने त्यावर 1950 मध्ये अवैध कब्जा केला होता.
शक्सगाम खोरे
चीनच्या अस्वस्थतेमागे शक्सगाम खोऱयाचा हिस्साही कारणीभूत आहे. हा भूभाग पाकिस्तानने चीनला सोपविला होता. येथूनच चीन आणि पाकमधील कॉरिडॉर निघत असल्याने तो अत्यंत महत्त्वाचा भूभाग असून त्याचा आकार सुमारे 7 हजार चौरस किलोमीटर इतका आहे. याच क्षेत्रात काराकोरम येत असुन याच्या दक्षिणपूर्वेला सियाचीन आहे.
पाकव्याप्त काश्मीर
महाराजा हरिसिंग यांच्याकडून जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यात आल्यावर पाकिस्तानने तेथे आक्रमण केले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले असले तरीही त्याच काही भाग पाकच्या ताब्यात आहे. सद्यकाणत 13297 चौरस किलोमीटरच्या या भूभागाला पाकव्याप्त काश्मीर म्हटले जाते आणि याच्या सीमा गिलगिट बाल्टिस्तानपासून पंजाबला लागून आहे. तर पश्चिम दिशेत याची सीमा खैबर पख्तूनख्वा प्रांताला भिडते.
गिलगिट बाल्टिस्तान
72971 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये काराकोरम पर्वतरांगेचा समावेश होतो. येथील अनेक शिखरे 7 हजार मीटरपेक्षाही उंच आहेत. या क्षेत्राचा आकार पीओकेपक्षा सुमारे 6 पट मोठा आहे. या भागात नैसर्गिक साधनसंपत्तीचे साठे असल्याने अनेक वर्षांपासून चीनची त्यावर नजर आहे.
अब्जावधींची गुंतवणूक
सीपॅकसाठी चीनने 62 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे चीन पाकच्या ग्वादारपर्यंत हातपाय पसरत आहे. या प्रकल्पातून आफ्रिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये स्वतःची उत्पादने पोहोचविण्यासह हिंदी महासागरात सैन्य उपस्थिती वाढविणे हा त्याचा हेतू आहे. चीनच्या भौगोलिक स्थितीमुळे पश्चिम दिशेला त्याचे कुठलेच बंदर नव्हते. पीओकेत भारताने कुठलेही पाऊल टाकल्यास चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीला फटका बसणार आहे. अशी स्थिती चीनला निश्चितच मान्य नसणार आहे.
Leave a Reply