संपादक-नानासाहेब जवरे
मुंबईः
पावसामुळे एकीकडे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चालल्याने याची चिंता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून दिसली. यामुळे नेहमी हसतमुख असणारे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज गंभीर दिसून आले. राज्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच पंचनाम्याचे आदेश दिले. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसून आला आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानावरील उपापययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पण यावेळी मुख्यमंत्र्यांचा चेहरा बरंच काही बोलून गेला. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भावमुद्रा भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेचा तिढा किती विकोपाला गेलाय याचे संकेत देत होती. बैठकीसाठी मुख्यमंत्री आले. त्यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारच्या उपाय योजनांची माहिती दिली आणि काही वेळातच बैठक संपल्याचं जाहीर केलं. यावेळी सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाढलेला तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. फडणवीस बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी नुकसानावरील उपापययोजनांसाठी अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेतली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फोटो असेल तरी पंचनामे समजून मदत दिली जाईल. सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नसेल तरी शेतकऱ्यांना यामुळे मदत मिळेल. तसंच ६ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळात मिळणाऱ्या सर्व योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाईल. विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी सरकारची चर्चा सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Leave a Reply